Tuesday, 27 August 2013

               !!!!! कर्मवीर दादासाहेब गायकवाड !!!!!
डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेल्या मानवमुक्तीच्या संग्रामाला सन १९२७ ला महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या रूपाने रणशिंग फुंकले . त्या रणसंग्रामात जर कोणी महत्वाचे योगदान दिले असेल तर आदरणीय भाऊराव कृष्णराव गायकवाड हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल . भाऊराव कृष्णराव गायकवाड हे अंधश्रद्धाळू सैनिक नव्हते तर ते डोळस होते ,ते प्रगाढ पंडित नव्हते तर आपल्या अभ्यासू वृत्तीने पंडितालाही लाजवेल असे ज्ञान संपादन केले होते . तळागाळातील लोकांसाठी बाबासाहेबांनी सुरु केलेल्या लढ्याला ज्या निष्ठावान सैनिकाने पेलली होती आणि आपल्या कर्तुत्वाने आंबेडकरी चळवळ खांद्यावर घेतली आणि बाबासाहेबांच्या महापरीनिर्वाणानंतर चळवळीचे नेतृत्व केले ते भाऊराव कृष्णराव गायकवाड  म्हणजेच समाजाचे "कर्मवीर" दादासाहेब गायकवाड झालेत .

                            दादासाहेबांच्या रूपाने अन्याय , अत्याचार ,जुलुमाविरुद्ध लढण्यासाठी भीमआवाज उठविण्यात आला . जेथे अन्याय झाला तेथे दादासाहेब उभे ठाकणारच त्यांनी थंडी ,वारा ,ऊन पाऊस ,भूक तहान ,नदी नाला आदींची पर्वा केलीच नाही . कोणत्याही अन्यायी गोष्टीचा छडा लावल्याशिवाय ते परतत नसत . ते काम घरचेच आहे अशा जिद्दीने ते काम करीत असत म्हणूनच ते लोकप्रिय झाले होते त्यांच्याबद्दल नितांत आदर ,आपुलकी ,जिव्हाळा ,प्रेम लोकांना वाटत असे . कर्मवीर दादासाहेबांच्या कार्याला गती मिळाली १९३० ते १९३५ अशी वर्षे चालणाऱ्या काळाराम मंदिर सत्याग्रह रूपाने  'चलो काळाराम मंदिर ' या घोषणेने त्यावेळची सिंहस्त पर्वणी ,दरवर्षीची राम नवमी दणाणून सोडली , त्या सत्याग्रह समितीचे दादासाहेब सेक्रेटरी होते . घरच खाऊन ,प्रसंगी उपाशी राहून हा सत्याग्रह इतक्या नेकीने आणि जिद्दीने दादासाहेबांनी आयोजित केला होता कि गोविंदराव देशपांडे , ,का .पाटील यांच्यासारख्यांनी दादासाहेबांचे कौतुक केले तर सावरकर ,डॉ मुंजे यांच्यासारख्या कर्मठ हिंदुत्ववाडी नेत्यांनी मंदिर प्रशासनाला पत्र पाठवून अस्पृश्यासाठी दरवाजे खुले करावे पण याचा काही उपयोग झाला नाही उलट तीन चार वेळा अस्पृश्यांना मार खावा लागला  अगदी खोल जखमा होईपर्यंत हल्ले झाले यात दादासाहेबांना तुरुंगवास भोगावा लागला .

१९३७ च्या मुंबई प्रांतिक कायदेमंडळावर दादासाहेब निवडून गेले आणि त्यातच त्यांचे कार्यक्षेत्र वाढतच गेले . नाशिक सार्वजनिक वाचनालय ,नगरपालिका ,नाशिक जिल्हा लोकल बोर्ड आणि मुंबई कायदेमंडळ अशी कक्षा विस्तारत गेली . खेडोपाडी जाऊन मागाससमाजासाठी विहिरी खुल्या व्हाव्यात ,वतने रद्द करावीत ,राखीव मतदार संघ असावे ,मागास शिक्षित तरुणांना नोकरीमध्ये योग्य ते प्रतिनिधित्व मिळावे अशा कितीतरी सुधारणेसाठी आपले पाय झिजवले ,अत्यंत साधी राहणी ,धोतर ,सदरा आणि निळी टोपी ने सर्व आंबेडकरी जनतेवर छाप पाडली . स्वाभिमानी भीमबाण्याने ते कधी कुणापुढे लाचार झाले नाहीत म्हणून कु . शांताबाई दानी , रा . सु . गवई ,रोहम आदी तरुण कार्यकर्ते त्यांच्याशी निष्ठेने आणि तळमळीने वागले . केवळ राजकारण हे त्यांच्या जीवनाचे सूत्र नव्हते तर समाजकारण आणि सुधारणा यावर त्यांचा भर होता म्हणून मनमाड ,नाशिक ,नाशिक रोड अशा अनेक ठिकाणी त्यांनी वसतिगृहे आणि माध्यमिक शाळा सुरु केल्या एव्हढेच नाही तर नाशिकला ' रमाबाई आंबेडकर वसतिगृह ' स्त्रियासाठी सुरु केल

बाबासाहेब दादासाहेबांचे कौतुक करताना म्हणत " हा माझा भाऊराव गायकवाड , माझ्या कसोटीवर शंभर नंबरी सोन्यासारखा उतरला आहे . हे सोने अतिशय शुद्ध आहे सर्व प्रकारच्या आगीतून ते तावून सुलाखून तसेच्या तसे शुद्ध राहिले आहे , तेव्हा तुमचा खरा नेता हाच आहे , हा माझा उजवा हात आहे . त्याने सार्वजनिक कार्य .तुमची उन्नती हेच त्याने स्वताच्या जीवनाचे ध्येय मानले आहे ,त्याला अन्य जीवन नाही . "
               भारताला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल पण भारताची दोन शकले झाली त्यात एक पाकिस्तान , त्या पाकिस्तानात हिंदू स्त्रियांची बेअब्रू ,विटंबना होत होती त्याला तोंड देण्यासाठी भारत सरकारने एक अधिकारी म्हणून दादासाहेबांची निवड केली . ते कराचीला गेले तिथे त्यांनी निर्भीडपणे आणि निधड्या छातीने काम केले आणि हिंदू स्त्रियांची सुटका केली म्हणूनच सरकारने त्यांना ' पद्मश्री ' हा किताब देऊन सन्मान केला . नागपूर मुक्कामी डॉ . बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यातही तितकाच दादासाहेबांचा सहभाग होता . पण  डिसेंबर ला बाबासाहेबांचे महपरिनिर्वाण झाले समाज पोरका झाला दादासाहेब जर नसते तर समाजाचे सांत्वन होऊ शकले नसते . समाजकार्यासाठी ,धम्मकार्यासाठी दादासाहेबांनी जीवाच रान केल आपल शरीर चंदनाप्रमाणे झिजविले असा पोलादी पुरुष बाबासाहेबानंतर समाजाला लाभला हे हे समाजाच महाभाग्यच म्हणावे लागेल आज आपण बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराने आणि आणि दादासाहेबांच्या पुण्याईने उभे आहोत ते केवळ सामाजिक परिवर्तनामुळे होऊ शकल आज बाबासाहेबांच्या रांगेत कोणा ' मसीहा ' ला कोणी बसवत असतील पण दादासाहेबांच समाज घडविण्याच कार्य हे कोण्या मसीहापेक्षा लाखपतीने आणि प्रामाणिकतेणे आहे त्याची सर इतर मासिहाशी होणार नाही .

बाबासाहेबांच्या ' रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ' ह्या पक्षाची कागदावरची रूपरेषा प्रत्यक्षात कर्मवीर दादासाहेबांनी आणली पक्ष अखिल भारतीय पातळीवर आणण्यात दादासाहेबांचा मोलाचा वाटा होता . ६० आणि ७० च्या दशकात पक्षाने महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब , उत्तर प्रदेश ,मध्यप्रदेश ,बिहार अशा अनेक ठिकाणी विधिमंडळावर आणि संसदेत आपले प्रतिनिधी पाठवले एव्हढेच नव्हे तर  पंजाब , उत्तर प्रदेश ,हरियाना मध्ये रिपब्लिकन पक्ष सत्तेचा वाटेकरी होता आणि हत्ती हे मूळ चिन्ह रिपब्लिकन पक्षाचे होते बाबासाहेबांचा हत्ती हि ओळख त्याकाळी होती म्हणून नंतर आयत्या बिळावर येणाऱ्यानी हे म्हणू नये कि तिथे सत्ता आम्ही निर्माण केली तिची पाळेमुळे अगोदरच रिपब्लिकन पक्षाने निर्माण केली होती . पुढे दादासाहेबांच्या आजारपणाचा कॉंग्रेस ने फायदा घेऊन त्यांच्या सहकारी असलेले मोर्य , गवई . कॉंग्रेस, बीजेपी  ने फोडून सत्तेचे तुकडे फेकून आंबेडकरी चळवळ नेस्तनाबूत करण्याचे काम केले . पण सामाजिक क्रांतीची जी पाळेमुळे आंबेडकरी समाजावर असल्यामुळे इथल्या जातीयवाद्यांशी लढण्यास बळ दिले . हे दादासाहेबांच्या पुण्याईचे फलित म्हणावे लागेल .

कर्मवीर दादासाहेबांच कार्य इतक मोठ आहे कि ते लिहिण्यासही अपूर्ण पुरते . संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कोणी अत्रे , जोशी , यशवंतराव चव्हाण ,अण्णा डांगे यांचे नाव इथला मिडिया घेत असला तरी यांच्याहून अधिक कार्य कर्मवीर दादासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी केलेलं आहे याचीच पावती म्हणून बाबासाहेबांच्याप्रमाणे जिवंतपणीच नाशिक नगरपालिकेने बसविला . दादासाहेबांनी १९६४ चा अखिलभारतीय भूमिहीनांचा लढा लढविला त्या सत्याग्रहात ,५०,००० लोक तुरुंगात डांबले गेले ,इथे मला  अभिमानाने सांगावेसे वाटते कि दादासाहेबांच्या या लढ्यात त्यांच्यासोबत माझ्या आजोबांनीही त्याकाळी ३० दिवस तुरुंगवास भोगला . इतकी हि प्रचंड चळवळ पाहून त्यावेळचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री देखील चकित झाले आणि म्हणाले," भूमिहीनांची हि चळवळ रास्त चळवळ आहे आणि त्यांच्या मागण्याही रास्त आहेत ,देशाने त्यांना दिल्या पाहिजे " . अर्थात याचे सर्व श्रेय कर्मवीर ,पद्मश्री आदरणीय दादासाहेब गायकवाड यांना जाते .

     अखेर २९ डिसेंबर १९७१ ला दादासाहेबावर काळाने झडप घातली ,एक उत्कृष्ट वक्ता ,संसदपटू ,देशभक्त ,समाजकारणी त्याहीपेक्षा बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले . आजच्या सुखवस्तूत जगणारा जो आंबेडकरी समाज आहे त्याने आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन चळवळीशी प्रामाणिक राहून बाबासाहेबांच्या विचाराना आणि कृतीला जीवाचे रान करणाऱ्या कर्मवीर दादासाहेबांच्या कार्याला जागे राहून हा चळवळीचा गाडा पुढे न्यावा खऱ्या आंबेडकरी विचाराशी आणि रक्ताशी एकरूप राहून स्वाभिमानी असल्याचे दाखवून देऊन चळवळीचा हा अनमोल ठेवा जपावा हीच माफक अपेक्षा आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड  या महान नेत्याला माझ्या लेखणीने वाहिलेली आदरांजली……………… जयभीम


                                                                         - प्रवीण जाधव