Sunday, 29 December 2013

!!! जातीव्यवस्था मानणारेच खरे गुन्हेगार !!!

ब्राह्मण म्हणून द्वेष , चीड ,राग निर्माण करणे , केवळ एखादा व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून त्याचा तिरस्कार करणे ह्या घातक प्रवृत्ती आहेत . काही संघटना ह्या फक्त व्यक्तीद्वेषावर उभ्या राहत असतील तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारतीय राष्ट्रवाद याला मुठमाती दिल्यासारखे होईल . परंतु जो ब्राह्मण निर्मित 'मनुवाद' जोपासत असेल तोच खरा जातीयवादी आहे मग तर कुठल्याही जाती , धर्माचा असेना . माझे अनेक मित्र , मैत्रिणी ब्राह्मण आहेत तेही बाबासाहेबांचे विचार जोपासतात , आज इतके ब्राह्मण समाजातले लोक आहेत त्यांनी मनुवादाला मूठमाती दिलेली आहे . जेव्हढ बाबासाहेबांचे विचार आपल्या समाजातील लोक वाचत नाहीत त्यापेक्षा अधिक अभ्यास काही प्रबोधनाचा मार्ग स्वीकारलेले ब्राह्मण करीत आहे याचा अर्थ सर्वच ब्राह्मण चांगले किंवा सर्वच ब्राह्मण वाईट असा होत नाही . बाबासाहेबांच्या संकल्पेनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि भारतीयत्वाची कल्पना दूर करून काही संघटना आणि लोक केवळ ते जन्माने ब्राह्मण आहे म्हणून जातीय द्वेष निर्माण करून जातीयतेचा हा पेटता निखारा तसाच तेवत ठेवतात . समाज प्रबोधनासाठी ३३ कोटी देवांना लाथ मारणारे अभिनेते ज्येष्ठ समाजसेवक श्रीराम लागू , ब्राह्मणवाद हा चुकीचा आहे अस सांगणारे प्र . के . अत्रे असो कि पु . ल . देशपांडे किवा अंधश्रद्धेविरुद्ध लढताना गोळ्या खाऊन मरणारे नरेंद्र दाभोळकर या सारखे अनेक लोक ब्राह्मणच आहेत . जर नुसता ब्राह्मण नावाने द्वेषसत्र सुरु ठेवले तर जो प्रामाणिक काम करणारा काही ब्राह्मण वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारख होईल . गांधी , जिना पेक्षाही श्रेष्ठ न्यायमूर्ती रानडे आहेत असे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग रानडे सारखी महापुरूषे हे त्यांच्याच ब्राह्मणव्यवस्थेशी झगडत होते . मुळात जो ब्राह्मणवाद पाळणारे कोणीही असो मग तेच खरे देशाचे दुश्मन आहेत असे मला वाटते .

ब्राह्मणापेक्षाही जास्त प्रमाणात जातिवाद आणि ब्राह्मणवाद ब्राह्मणवादाच्या सावलीत वाढणाऱ्या काही जातीत तो अधिक आहे . स्वतःच्या जाती ब्राह्मण व्यवस्थेमध्ये शुद्र असूनही इतर जाती धर्माला कानिष्टतम दाखविणाऱ्या या जाती खरा ब्राह्मणवाद पाळत आहेत आणि अगोदर अनेक हजारो वर्षापासून जातीपातीच्या उतरंडी खाली जगण्यातच धन्यता ह्या काही मानात आलेल्या आहेत . महाराष्ट्रामध्ये खासकरून मराठा समाजाकडून अनेक कालखंडापासून इतर मागाससमाजावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे . याचा अर्थ संपूर्ण मराठा समाज दोषी नाही परंतु अलीकडच्या काळात मराठा समाजामध्ये याचे प्रमाण बहुतांश आहे . समाजप्रबोधनाचा ठेका घेतलेल्या काही संघटना विशेष करून मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड यांची मानसिकता फक्त ब्राह्मण द्वेष निर्माण करणारी अधिक वाटते . एक नंबर च्या खुर्चीवर असलेला ब्राह्मण समाज केव्हा खाली येउन त्यावर आपला नंबर केव्हा लागतो हेच या संघटनांच्या कृतीतून अधिक भासते . मागासवर्गीयांवर जेव्हा ज्या समाजाकडून अन्याय , अत्याचार होतो तेव्हा त्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना त्यांच्या समाजात जाऊन याच प्रबोधन करतात का ? मागास समाजावर जेंव्हा अत्याचार , खून , बलात्कार इ . वाईट गोष्टी होतात त्यावर कधी मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड , जिजाऊ ब्रिगेड कधी तोंडातून ब्र काढतात का ? मग रस्त्यावर उतरून न्याय हक्क मिळवून देणे तर दूरची गोष्ट आहे . मूलनिवासी , बामसेफ , भारत मुक्ती मोर्चा , अम्बस सारख्या संघटना फक्त पैसा गोळा करणे आणि समाजप्रबोधनाच्या नावाखाली भाषणे देणे या व्यतिरिक्त गेल्या २५ - ३० वर्षापासून काहीही करीत नाहीत . मराठा संघटनाना अन्याय ,अत्याचार फक्त आपल्या समाजावर दिसतो ,अशा जबाबदार लोकांची जबाबदारी हवी कि समाजाला वाईट गोष्टीपासून परावृत्त करणे . निव्वळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेवून आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या संघटना आणि विनायक मेटे सारखे लोक फक्त समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करतात . अन्याय अत्याचार जेव्हढे जबाबदार आहेत तेव्हढ्याच ह्या संघटना प्रबोधनाच्या नावाखाली अन्याय , अत्याचारावर मूकपणा बाळगणारे जबाबदार आहेत .

अन्याय , अत्याचार जिथे झाला तिथली परिस्तिथी न जाणता आपणही पेपर , टीव्ही मधून येणाऱ्या बातम्यांना हवा देऊन फक्त संघर्षाचे आणि जातीयतेचे विष पेरत असतो . समाजातील काही लोक फक्त मोठेपणा दाखविण्यासाठी सदर प्रकरणाला हवा देऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम करतात . ज्या कुटुंबावर , समूहावर अन्याय अत्याचार झाला त्या कुटुंबाला कायदेशीर साथ देणे , गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी झटणे , त्या कुटुंबाला आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे , परत असले अन्याय , अत्याचार होऊ नये म्हणून तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे , जाती ह्या नष्ट झाल्या पाहिजे यासाठी जातीअंताचा लढा सुरु ठेवणे ,हि आपली आंबेडकरी समाजाची मोठी जबाबदारी असली पाहिजे . तथागत भगवान बुद्ध ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार स्वातंत्र्य , समता , बंधुता , शांती , अहिंसा ,मैत्री , प्रेम या तत्वांचे रुजुनीकरण होण्यासाठी झटणे तेव्हाच अन्यायग्रस्त समाजाला आणि त्यादृष्टीने तशी व्यवस्था निर्माण होण्याला न्याय देण्यासारखे होईल .

!!! नमो बुद्धाय ……… जयभीम !!!
- प्रवीण जाधव
 

No comments:

Post a Comment